Friday, 20 July 2018

एक वर्ष देशासाठी

मला वाटते भारतात काही गोष्टी सक्तीच्या कराव्या लागणार आहेत. त्यातील प्रमुख गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भारतीय सैन्यात किमान एक वर्ष देणे. भारतीय सैन्यात अनेक विभाग आणि अनेक कामे आहेत. त्या व्यक्तीच्या कुवतीनुसार त्याला ती कामे देण्यात यावीत. त्याने काही गोष्टी आपोआप साध्य होऊ शकतील.

१. १८ ते २२ हे वय असे असते की त्या वयात प्रत्येक जण काहीसा बंडखोर असतो. त्याच्यात एक उर्जा तयार होत असते आणि ती व्यवस्थित खर्च झाली नाही तर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसू लागतो. कित्येक मुले याच यावात रस्त्यावर मारामाऱ्या करणे, भांडणे करणे, घरात चिडचिड करणे आणि आता फेसबुक / ट्विटर अशा ठिकाणी अत्यंत प्रक्षोभक विधाने करणे अशा गोष्टी करतात. त्याने समाजात फक्त तेढ निर्माण होऊ शकते. पण याच वयात जर त्यांना सैन्यात सामील केले गेले तर आपोआप त्यांच्यातील उर्जेला एक योग्य दिशा मिळू शकते.

२. या काळात त्या मुलांना महिना १००० रुपये दिले तर त्यांना पैशाचे महत्व समजू शकते. जे पैसे आपण बेकारीभत्ता म्हणून तरुणांना देतो तो जर अशा गोष्टीमधून त्यांना मिळाला तर ते देशासाठी चांगलेच आहे.

३. प्रत्येक जण देशाच्या सैन्यात राहून आलेला असल्यामुळे आणि प्रत्येकाने आपले एक वर्ष देशासाठी दिलेले असल्यामुळे ती व्यक्ती सहसा देशविघातक कृत्य करण्यास प्रवृत्त होत नाही. यामुळे बरेच गुन्हे आपोआप कमी होऊ शकतात.

४. भारतीय सैन्यात सैनिक हा हिंदू / मुस्लीम / इसाई नसतो तर फक्त भारतीय असतो. जातीयवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या यामुळे अगदी कमी होऊ शकतात. आज कित्येक लोकं इतर धर्माच्या लोकांना तुम्ही देशप्रेमी आहात हे सिद्ध करा असे म्हणतात. स्वतः देश विघातक कृत्ये करून देखील. या गोष्टीलाही बराचसा आळा बसू शकेल.

५. प्रत्येकाला सैनिकी शिक्षण दिल्यामुळे त्या मुलांमध्ये आपोआपच देशप्रेम जागृत होऊ शकेल तसेच त्यांच्यात शिस्तही निर्माण होईल. याच माध्यमातून मग देशासाठीच्या योजना चांगल्या रीतीने कार्यरत होऊ शकतील.

मी हे म्हणत नाही की यामुळे सगळेच प्रश्न सुटतील. काही जण तर त्यानंतर देखील गुन्हे करू शकतील, विचित्र वागू शकतील पण त्यांचे प्रमाण आजच्या पेक्षा कैकपटीने कमी असेल. माझ्याच बद्दल बोलायचे झाले तर माझे देशप्रेम हे फक्त कुणी देशाला नावे ठेवलीत तर फेसबुकवर त्याला शिव्या देण्यापुरते मर्यादित झाले आहे. आणि त्यामुळेच माझा वापर कुणीही देशाचे नाव घेऊन पाहिजे तसा करू शकतो. कित्येक वेळेस अशा गोष्टीमुळे एकतर मी व्यक्तिपूजक बनतो किंवा एखाद्याच्या हातातील बाहुले बनतो. देशाचा विचार मात्र बाजूलाच राहतो. देशासाठी मी काय करतो आहे हे विसरून राजकीय पक्षांनी काय केले यावर मोठमोठ्या चर्चा करतो. ज्याचा काडीचाही उपयोग देशाला होत नाही. पण तेच जर मला १ वर्ष सैन्यात काढावे लागले असते तर मी आज जो आहे त्यापेक्षा खचितच वेगळा असतो. आणि म्हणूनच मला प्रत्येकाने किमान १ वर्ष सैन्यासाठी देणे हे जास्त जरुरीचे वाटते.

No comments:

Post a Comment