बऱ्याच वेळेस बाबाजी आप्पांशी ( माझे आजोबा ) गप्पा मारण्यासाठी घरी
यायचे. आप्पा पेन्शनर असल्यामुळे कायम घरीच असायचे. त्यामुळे मग
त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी बाबाजीही येऊन बसत. तसा आप्पांचा देवावरील
विश्वास असून नसून सारखाच. त्यांचा बाबा, बुवांवर किंवा भविष्यावरही फारसा
विश्वास नव्हता. त्यामुळे बाबाजींशी त्यांच्या गप्पाही अगदी जनरल असायच्या.
इतकेच काय पण आप्पांनी त्यांना नमस्कार केलेलाही माझ्या आईच्या तोंडून मी
कधी ऐकले नाही. आप्पांनी कधी बाबाजींना त्यांचे कुळ / मूळ विचारले नाही आणि
बाबाजींनीही कधी ते सांगितले नाही. आप्पांना बाबाजी ‘मास्टरजी’ म्हणत.
बहुतेक ते वर्ष असावे १९७२. त्या दिवशीही बाबाजी असेच घरी आले होते. वेळ
सकाळी साडेअकरा बाराची असावी. आईची शाळा सुटली आणि ती अगदी घाईतच घरात आली.
घरात बाबाजी बसलेच होते. बाबाजींना पाहताच तिने त्यांना नमस्कार केला.
त्यांनीही लगेच तिला प्रती नमस्कार केला. बाबाजींनी कधीच माझ्या आईचा
नमस्कार स्वीकारला नाही. त्याचे कारण मात्र तिला कधीच समजले नाही.
“आई... मला आधी काहीतरी खायला दे... खूप घाई आहे...” आईने आजीला सांगितले.
“क्यू महारानी... इतनी जल्दी क्या है?” बाबांजींनी विचारले.
“बाबा... भद्रकाली मंदिरात गजानन महाराज आले आहेत. त्यांच्याच दर्शनाला जायचे आहे.” आईने घाईतच सांगितले.
“यहां गजानन आया है?” बाबाजींनी आश्चर्याने विचारले.
“हो... बाबाजी... आताच माझी मैत्रीण भेटली होती. तिने सांगितले मला...”
आईने सांगितले आणि बाबाजींनी अगदी क्षणभरच डोळे मिटले आणि त्यांच्या
चेहऱ्यावर हसू उमटले.
“बाबा... का हसताय तुम्ही?” आईने विचारले.
“महारानी... मत जाव वहां... वो कोई गजानन नही है. एक छोटा बच्चा है, जो न
ठीक से बोल पाता है, ना चल पाता है...” बाबांजींनी सांगितले.
“नाही बाबा... आम्ही सगळ्या मैत्रिणी जाणार आहेत दर्शनाला...” आईने तिचा निर्णय सांगितला.
“ठीक है... जाव... वैसे भी वो कल चला जायेगा...” काहीसे शून्यात पहात
बाबाजी म्हणाले आणि परत त्यांनी आप्पांशी गप्पा मारायला सुरुवात केली.
आईने जेवण उरकले आणि ठरल्या वेळी सगळ्या मैत्रिणी भद्रकाली मंदिरात गजानन महाराजांच्या दर्शनाला हजर झाल्या. मंदिरात गजानन महाराज म्हणून आलेला लहान मुलगा अगदीच खुळा दिसत होता. त्याच्या गळ्यात ३/४ फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. दर्शनाला लोकांनी दोन रांगा लावल्या होत्या. प्रत्येक जण त्या मुलाच्या पायावर डोके ठेवत होते. त्याला फुलांची माळ घालून, नमस्कार करून बाजूला होत होते. त्यातील अनेक जण तिथेच जवळ ठेवलेल्या तबकात आपापल्या इच्छेनुसार पैसे टाकत होते. त्याच्या बाजूलाच त्याचे वडील बसले होते. मुलाच्या गळ्यात घातले जाणारे हार काढून ते बाजूला ठेवत होते. तो मुलगा फक्त खुळ्यासारखे डोके हलवत होता. आईचा नंबर आला. तिनेही त्या मुलाच्या पायावर डोके ठेवले. मनोभावे नमस्कार केला आणि घरी आली. तो पर्यंत बाबाजी निघून गेले होते.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आई शाळेत गेली. तेथील शिक्षिका एकमेकीत गप्पा मारत होत्या.
“अहो... गजानन महाराज तर अजून ३ दिवस राहणार होते ना? मग असे अचानक कसे काय निघून गेले?” एकीने विचारले.
“अहो बाई... असे लोक त्यांच्या मनाचे राजे असतात. त्यांच्या मनात कधी काय
येईल हे काय सांगावे? जाऊ द्या... मी कालच त्यांचे दर्शन घेऊन आले म्हणून
बरे झाले बाई... सुदैवच म्हणायचं माझं.” दुसरी शिक्षिका म्हणाली. ते ऐकून
आईला बाबाजींचे शब्द आठवले.
दुपारी आई शाळा सुटून घरी आली त्यावेळेस बाबाजी बसलेच होते.
“क्यू महारानी... आज नही जाना गजाननका दर्शन लेने?” त्यांनी आई दारात असतानाच तिला विचारले.
“बाबा... ते काल रात्रीच निघून गेले...” आईने सांगितले आणि बाबाजींनी
त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आप्पांनी मात्र कुतूहल म्हणून
त्यांना याबद्दल विचारले.
“मास्टरजी... वो कोई गजानन नही है ! छोटा
बिमार बच्चा है, और उसका इलाज हो सके, इसलिये उसके बापने उसे गजानन बनाया
है. जब से वो गजानन बना है, अच्छी कमाई हो रही है. कल मैनेही दो लोगोंको
उसके यहां भेजा था, और उसको मेरे यहां बुलाया. पहेले तो उसने अनाकानी की,
लेकीन रात मे दोनो आये थे... फिर मैने ही उस आदमी से कहा, ‘अबतक जितना मिला
है उतनेमे ही संतोष कर और अपने बच्चे का इलाज करा. कल अगर तुम दोनो यहां
रुके तो मै खुद वहां आ जाऊंगा... और हां... तुने ऐसे ही लोगोंको ठगने का
काम चालू रखा तो तुझे पैसा तो मिलेगा, लेकीन तेरा बेटा कभीभी ठीक नही हो
पायेगा...’ शायद मेरी बात उसके समझ मे आ गयी और वो रात को ही यहां से चले
गये.” बाबाजींनी सांगितले. त्यानंतर ते आईकडे वळले.
“महारानी...
किसी भी मंदिरमे भगवान के सामने सर झुकाओगी, तो वो भी नमस्कार गजाननको मिल
जायेगा... ऐसे भोंदू लोग तो हर ढाई तीन साल बाद मिल ही जाएंगे... लेकीन किसपर कितना विश्वास करना है इसका निर्णय तो तुम्हे ही लेना होगा. और वो भी
अपना दिमाग खुला रखकर...”
या घटनेने एक गोष्ट मात्र झाली. कितीही
प्रसिद्ध बाबा, बुवा, स्वामी असले तरीही माझ्या आईने एका ठराविक
मर्यादेपर्यंतच त्यांचा सन्मान केला. पण ती त्यांच्या आहारी कधीही गेली
नाही. तिच्या मते शोषण करणाऱ्या पेक्षा आंधळा विश्वास ठेवून शोषण करून
घेणारा जास्त दोषी असतो.
No comments:
Post a Comment