सध्या आपण देशापुढील प्रश्न पाहिले तर सर्वात जास्त महत्वाचा आणि
तितकाच विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे स्त्रीवर होणारे अत्याचार. मग
तो हुंड्यासाठी छळ असो, किंवा पारिवारिक हिंसा असो वा स्त्री भ्रूणहत्या.
आता पर्यंत यांवर खूप जणांनी खूप विचार मांडले आहेत. याची खूप समीक्षाही
झालेली आहे. बऱ्याच जणांनी त्यासाठी समाजाचे प्रबोधन करायलाही सुरुवात केली
आहे. सरकारने अनेक कायदेही केलेले आहेत. पोलीस यंत्रणा याकडे खुपच
संवेदनशीलपणे पहातही आहे आणि तरीही हा प्रश्न जसाच्या तसा आहे. रोजच कुठे
आजीने नातीची हत्या केल्याच्या बातम्या तर कुठे उकिरड्यावर स्त्रीभ्रूण
मिळाल्याच्या बातम्या, कुठे पतीने मारझोड केली तर कुठे हुंड्यासाठी सुनेची
हत्या. वर्तमान पत्राच्या पहिल्या काही पानांवर या बातम्या असणारच. नावे
आणि गावे वेगवेगळी असली तरी घटना मात्र बहुतांशी सारख्याच असतात.
काय कारण असेल यामागे? आपण जेंव्हा याचा विचार करतो त्यावेळेस डोके
भंडावून जाते. खरे आहे जेंव्हा अडाणी लोकं असे कृत्य करतात त्यावेळेस आपण
समजू शकतो, पण हे कृत्य करणारे लोकं चांगले सुशिक्षित असतात. उच्च वर्गातले
असतात आणि तरीही अशी कृत्ये करतातच. मध्यंतरी जे लोकं यात पकडले गेले
त्यांचा व्यवसाय, शिक्षण पाहिले तर आपल्याला असे आढळेल की हे लोकं नुसते
उच्चशिक्षितच नाहीत, तर समाजात प्रतिष्ठा असलेले आहेत. मग ते असे का
वागतात? जराही माणुसकी नाही का त्यांच्यात? समस्येचे विश्लेषण अनेक लोकांनी
त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार आणि अनुभवानुसार केलेच आहे. पण आता नुसते
विश्लेषण करून चालणार नाही तर त्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील याचाही
विचार होणे तितकेच गरजेचे आहे.
या बद्दल जेंव्हा कधी माझ्या
घरात चर्चा व्हायची त्यावेळेस माझी आई यावर एक उपाय मांडायची. अनेकांना तो
काहीसा वेगळा किंवा विचित्र वाटेल पण मला मात्र तो पूर्णतः पटतो. तोच विचार
मी इथे फक्त शब्दबध्द करतो आहे. तिच्या मते या सगळ्या प्रकारामागे फक्त
एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेत स्त्रीचे असलेले
स्थान. मी समाज हा शब्द यासाठी वापरतो आहे कारण हा प्रश्न काही फक्त एका
धर्माचा नाही तर भारतातील प्रत्येक धर्माचा आहे. अगदी जो स्वतःला निधर्मी
मानतो, त्याचा देखील. कारण आपण कोणत्याही जाती धर्माचे असलो तरीही आपल्या
काही कृती ह्या अगदी सारख्या आहेत. त्यातील प्रमुख गोष्ट म्हणजे “मुलगी
सासरी जाणे.” माझी आई नेहमी म्हणायची, “जो पर्यंत मुलीला सासरी पाठवण्याची
प्रथा आपण पाळतो आहोत तो पर्यंत पुरुष प्रधान संस्कृती नष्ट होणे कदापी
शक्य नाही.” आता याला खुपच जणांचा विरोध असेल. कारण काहीही असो. कुणी
त्याला धार्मिक कारण देईल तर कुणी वैज्ञानिक तर कुणी भावनिक. पण एकदा जरा
त्रयस्थपणे विचार करून पहा तुम्हाला तिच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य वाटेल.
मी असे नाही म्हणत की फक्त हे एकच कारण आहे स्त्री भ्रूणहत्ये मागे. इतरही
अनेक कारणे आहेतच पण माझ्या मते सगळ्यात मोठे कारण हेच आहे.
आपल्या भारतात पहा, तुम्ही कोणत्याही धर्माचे असला तरी तुमचे लग्न झाले की,
तुम्ही स्त्री असाल तर पतीच्या घरी जातात आणि पुरुष असाल तर पत्नीला
आपल्या घरी आणतात. का? तर तशी परंपरा आहे. म्हणजे पुरुष बायकोच्या घरी
वर्षातून एकदा गेला तरी विशेष, पण इतर दिवस बाईनेच पतीच्या घरी राहायचे.
जावई मंडळी सासूला पाहिजे ती नावे ठेवणार पण बायकोने मात्र आईबद्दल
अवाक्षरही काढलेले त्या माणसाला चालत नाही. अजूनही ८०% कुटुंबात पुरुष साधा
चहा देखील बनवीत नाही, पण बाईने मात्र घरातले सगळे काम करून वरती कुठेतरी
नोकरीही करावी अशी त्याची अपेक्षा असते. का? कशासाठी? आज बाईचा हुंड्यासाठी
छळ होतो. तिचा बळी घेतला जातो. कारण ती सासरी एकटी असते. पण त्या पुरुषाचे
सगळेच कुटुंबीय त्याच्या सोबत असतात. आणि हेच कारण असते की माणसाला मुलगी
पेक्षा मुलगा हवा असतो. कारण मुलगी सासरी जाणार असते, पण मुलगा घरीच राहणार
असतो. कित्येक जण मुलगी नको याचे काय कारण देतात तर तिला कुणी त्रास
दिलेला आम्हाला बघवणार नाही. आता जर मुलगी त्यांच्या डोळ्यासमोर कायम
राहिली तर त्या लोकांचा हा मुद्दाही निकाली निघेल. त्यामुळेच माझी आई
म्हणायची तसे आता कायद्याने किमान काही वर्षे तरी मुलीऐवजी मुलाला सासरी
पाठवावे. ह्या एका गोष्टीमुळे स्त्रियांवर होणारे अनेक अत्याचार नियंत्रणात
येती.
No comments:
Post a Comment